श्रीगोंदा : शेतकरी सभासदांनी आपल्या दीर्घ मुदत, मध्यम मुदत तसेच पशुपालन कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करून शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळक

श्रीगोंदा : शेतकरी सभासदांनी आपल्या दीर्घ मुदत, मध्यम मुदत तसेच पशुपालन कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करून शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’चा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनाने कर्जदार शेतकरी सभासदांसाठी ही महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी दीर्घ मुदत, मध्यम मुदत तसेच पशुपालन कर्जाची संपूर्ण परतफेड करणे आवश्यक आहे. नियमित कर्जदारांनीही ५० हजार रुपयांच्या लाभासाठी याच मुदतीत कर्जबाकी भरावी, अन्यथा ते कर्जमाफीपासून वंचित राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच कर्ज थकीत राहिल्यास सध्याच्या १३ टक्के व्याजदराऐवजी १५ टक्के व्याजदर लागू होणार असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वेळेत कर्जफेड केल्यास जिल्हा सहकारी बँकेकडून भविष्यात कर्ज मिळवणे सुलभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तरी सर्व कर्जदार शेतकरी सभासदांनी वेळेत कर्जफेड करून शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

COMMENTS