मुंबई: राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्

मुंबई: राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सून अधिक सक्रिय झाल्याने तसेच गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर होत असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे.
पुणे व सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर कोकणातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही भागांत अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
धान लागवडीला वेग, तर अकोल्यात चिंता
गोंदिया जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेतीकामांना मोठा वेग आला आहे. धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात धान लागवडीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. धान लागवडीसाठी महिला मजुरांची मागणी वाढल्याने ग्रामीण भागात रोजगारालाही चालना मिळाली आहे.
याच्या उलट अकोला जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पावसाची नोंद झाली असून सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरणी अद्याप बाकी आहे. पावसातील २२ टक्के तुटीमुळे धरणांतील पाणीसाठाही अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने भविष्यातील पाणीस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार अल्पकालीन पिकांची निवड करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
दरम्यान, कमी कालावधीत अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद होत असल्याबाबत हवामान तज्ज्ञांनी मान्सूनच्या प्रणालीतील चढ-उतार, वातावरणातील बदल, ‘एल निनो’ व ‘ला निना’ यांसारख्या घटकांचा प्रभाव तसेच वाढते प्रदूषण ही प्रमुख कारणे असल्याचे नमूद केले आहे.

COMMENTS