कोपरगाव: गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदारसंघातील सर्व पाझर तलाव, गाव तळे, बंधारे आण
कोपरगाव: गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदारसंघातील सर्व पाझर तलाव, गाव तळे, बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
यंदा अल निनोच्या सावटामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. त्या अंदाजाप्रमाणे जून महिना कोरडाठाक गेल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खाली जाऊन चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीला वरुणराजाने राज्याच्या विविध भागांसह धरणक्षेत्रात दमदार हजेरी लावल्यामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी हे ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या जरी संततधार पाऊस सुरू असला तरी हवामान खात्याने यंदा पाऊस कमी पडण्याचा दिलेला अंदाज आणि अल निनोचा धोका लक्षात घेऊन पुढील पाणीटंचाईच्या नियोजनासाठी आत्ताच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आणि भुईमूग यांसारख्या विविध खरीप पिकांची पेरणी केली आहे. जर आगामी काळात खरीप पिकांसाठी आवश्यक पर्जन्यमान झाले नाही तर खरीप हंगाम धोक्यात येऊन अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.
मागील चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांसह धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला सुरू असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदारसंघातील सर्व पाझर तलाव, गाव तळे, बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या सूचना आ. काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून खालावलेली भूजलपातळी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास आ. काळे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS