सोनई : प्रस्तावित राहुरी–शनीशिंगणापूर रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. ८ जून) सोनई परिसरातील बेल्हेकरवाडी येथे करण्यात
सोनई : प्रस्तावित राहुरी–शनीशिंगणापूर रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. ८ जून) सोनई परिसरातील बेल्हेकरवाडी येथे करण्यात येणाऱ्या मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. शेकडो शेतकरी एकत्र येऊन मोजणी प्रक्रिया रोखल्याने शासनाच्या भूमापन पथकाला मोजणी न करताच माघारी परतावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक पर्यटन वाढी साठी प्रस्तावित २१.८४ किमी राहुरी–शनीशिंगणापूर रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या अधिग्रहण प्रक्रिये अंतर्गत घोडेगाव (ता. नेवासा) येथील भूमीअभिलेख कार्यालयाच्या वतीने मोजणीचे नियोजन करण्यात आले होते. घोडेगाव येथील भूमीअभिलेख विभागाच्या अधिकारी अनिता भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचे भूमापन पथक सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बेल्हेकरवाडी परिसरात दाखल झाले.मात्र, मोजणीसाठी अधिकारी येत असल्याची कुणकुण लागताच सोनई, बेल्हेकरवाडी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. शेतकऱ्यांनी मोजणी पथकाला घेराव घालत रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणास ठाम विरोध असल्याची भूमिका मांडली. आपल्या बागायती आणि उत्पादक जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी देण्यास नकार देत पुन्हा मोजणीसाठी येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता प्रशासनाने परिस्थिती शांततेने हाताळण्याचा प्रयत्न केला. अखेर मोजणीची प्रक्रिया स्थगित ठेवत अधिकारी वर्गाला माघारी परतावे लागले. यावेळी भूमीअभिलेख विभागाच्या अधिकारी अनिता भिंगारदिवे यांनी मोजणीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा घटनास्थळी पंचनामा केला तसेच संबंधितांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या. रेल्वे प्रकल्पाची गरज नाही; मुख्यमंत्र्यांना भेटणार : पालकमंत्री विखे
राहुरी शिंगणापूर अंतर कमी असल्यामुळे या रेल्वे प्रकल्पाची गरज नाही. याबाबत मी मुंबई येथे बैठक घेतली आहे. तरी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून परिस्थिती समजून सांगू. शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाऊ देणार नाही असे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी येथे नवनिर्वाचित आ.प्राजक्त तनपुरे यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना सांगितले.

COMMENTS