Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी शिष्टमंडळाची 29 सप्टेंबरला राज्य सरकारसोबत बैठक

मुंबई/प्रतिनिधी ः ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी नको, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा शुक्रवारी 13 वा

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बावनकुळे विजयी
मिरवणुकीदरम्यान 11 जणांचा मृत्यू , दोन चिमुकल्यांचा समावेश |
जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार : प्रतीक पाटील

मुंबई/प्रतिनिधी ः ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी नको, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा शुक्रवारी 13 वा दिवस आहे. रविवारपर्यत चर्चेला न बोलावल्यास सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला होता. मात्र तत्पूर्वीच शुक्रवारी भाजप जिल्हाध्यक्ष सुधारक कोहळे यांनी 29 सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र तायवाडे यांना सुपूर्द केले. त्यानंतरही बैठकीत लेखी आश्‍वासन मिळेपर्यत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय महासंघाने घेतल्याची माहिती सचिव शरद वानखेडे यांनी दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन केले होते. राज्य सरकारने जरांगे पाटलांना आश्‍वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. परंतु जरांगे पाटलांच्या मागणीला ओबीसी समाजाकडून विरोध केला. जरांगे पाटलांच्या मागण्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहेत. मराठ्यांना कुणबी दाखले देण्याच्या निर्णयाविरोधात नागपूरमध्ये ओबीसी समाजाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनातील ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारने बैठकीसाठी निमंत्रण दिले. ओबीसी समाजाच्या 45 जणांच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारने 29 सप्टेंबरला बैठकीसाठी बोलवले आहे. ही बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार आहे. सरकारने राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय कुणबी नेत्यांना बैठकीला बोलवले आहे. दरम्यान बैठकीसाठी वेळ दिल्यानंतर ओबीसी समाजाने आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली जात आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती भाजपचे ओबीसी नेते परिणय फुके यांनी मागणी केली. परिणय फुके हे बैठकीचे पत्र घेऊन आंदोलनस्थळी पोहचले आहेत. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संविधान चौकात उपोषण आंदोलन सुरू आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. सरकारने रविवारपर्यंत चर्चेला बोलावले नाही तर सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला. 

COMMENTS