मुंबई : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रकरणावरून भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद अधिकच तीव्

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रकरणावरून भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद अधिकच तीव्र झाला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर तीव्र शब्दांत टीका-प्रत्युत्तरे होत असून राजकीय वातावरण तापले आहे.
वडेट्टीवार यांनी राणा यांच्या वक्तव्यावर टीका करताना त्या जातीय द्वेष पसरवणाऱ्या ‘विषवल्ली’ असल्याचा आरोप केला. जात-धर्माच्या आधारे समाजात तेढ निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये जात-धर्माचा संबंध जोडणे चुकीचे असून अशा कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, असेही त्यांनी नमूद केले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे. जात आणि धर्मात भांडण लावून सत्तेची पोळी कशी शेकता येईल? यासाठी पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे. महिलांवरील अत्याचारासंदर्भात जात आणि धर्म कुठे येतो? असे कृत्य करणारा नालायक असतो त्याला फाशी झालीच पाहिजे. तिथे बुरखावाले नव्हते, असं नवनीत राणा कोणत्या आधारावर बोलली? तोंडात आलं की काहीपण वाफा काढायचं का? या बाईची जीभ जातीयवादी आणि धर्मांध बनली आहे. लोकांनी निवडणुकीत पाडून जिरवलं तरी अजून शुद्धीवर यायला तयार नाही.
त्यांना हनुमान चालीसाच्या दोन ओळी बोलता येत नाही. ते हिंदू धर्माच्या गोष्टी बोलत आहेत. खरात प्रकरणावर ब्र न काढणारी बाई. मुस्लीम तरुण दिसल्याबरोबर बावचळल्यासारखी बोलते हे अत्यंत घृणास्पद आहे. त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. नवनीत राणा यांनी धर्मांध पसरविण्याचा आणि दोन धर्मात तेढ पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक व्हायला पाहिजे, अशी टीका त्यांनी नवनीत राणा यांच्यावर केलीय.
काँग्रेसने हिरवे विषारी साप पाळले
नवनीत राणा यांनी देखील विजय वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केलाय. हे सगळे चिल्लर लोक आहेत. त्यांच्यावर बोलण्याची मला गरज नाही. काँग्रेसने हिरवे विषारी साप पाळून ठेवले आहेत. म्हणून ते वळवळ करत आहेत. हे सगळे प्रकार आता बाहेर येत आहेत. काँग्रेसच्या काळात या हिरव्या सापांना जपण्याचं काम काँग्रेसने केलं आणि हे प्रकरण दाबण्याचे काम काँग्रेसने केलं. हिरव्या सापांना ठेचण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस करतील.

COMMENTS