https://www.youtube.com/watch?v=VbfTeOlDMyo आईचं प्रेम आणि मुलांसाठी तिने दिलेला सर्वोच्च त्याग… पण या त्यागाचा शेवट इतका भीषण असेल असं
आईचं प्रेम आणि मुलांसाठी तिने दिलेला सर्वोच्च त्याग… पण या त्यागाचा शेवट इतका भीषण असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या दोन चिमुकल्यांना पाण्यात बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी आईने जीवाची बाजी लावली, मात्र या प्रयत्नात मायलेकांसह तिघांनाही जलसमाधी मिळाली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील ३५ वर्षीय वैशाली अनिल घोडके, गुरुवारी सकाळी आपली मुलं श्रेया आणि सोहम यांच्यासह साठवण तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. काठावर मुलं खेळत असताना अचानक दोघांचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. मुलांना बुडताना पाहून वैशाली यांनी कसलाही विचार न करता तलावात उडी घेतली.
दुर्दैवाने वैशाली यांनाही पोहता येत नव्हते. वाचवण्यासाठी तिघांचाही आक्रोश सुरू झाला, किंचाळ्या ऐकू येत होत्या, पण मदतीला कोणी पोहोचण्यापूर्वीच तिघेही पाण्यात गडप झाले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून आई वैशाली यांचा मृतदेह बाहेर काढला, मात्र १२ वर्षांची श्रेया आणि १० वर्षांचा सोहम अजूनही बेपत्ता आहेत.
घोडके कुटुंबावर जणू काळानेच घाला घातला आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्य गेल्याने संपूर्ण खडकी गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या मुलांचे मृतदेह एकदाचे हाती लागावेत यासाठी घोडके कुटुंब आणि नातेवाईक तलावाकाठी टाहो फोडत आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर मुलांचा शोध घेत आहेत.

COMMENTS