पालघर: पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, शनिवारी सकाळी जिल्ह्यात भूकंपाचा सौम

पालघर: पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, शनिवारी सकाळी जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शनिवारी सकाळी सुमारे १० वाजून ५८ मिनिटांनी डहाणू व तलासरी तालुक्यातील कासा-धुंदलवाडी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिष्टर मापन पद्धतीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.१ इतकी नोंदवण्यात आली. काही क्षण जमीन हादरल्याची जाणीव होताच अनेक नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर पडले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती प्रशासनाकडे अद्याप आलेली नाही. संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कासा-धुंदलवाडी परिसर हा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. गेल्या काही वर्षांत या भागात वेळोवेळी कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण असते. यापूर्वीही अशा स्वरूपाचे सौम्य धक्के या परिसरात नोंदवण्यात आले असून, शनिवारी झालेला हादराही त्याच मालिकेतील मानला जात आहे.
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या व ओढ्यांना पूर आला असून काही सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली असून प्रशासनाकडून पावसासह भूकंपाच्या परिस्थितीवरही सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

COMMENTS