मेंदूचे पुनर्भरण व्हावे !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मेंदूचे पुनर्भरण व्हावे !

जितेंद्र सतीश आव्हाड हे सध्या महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्याचप्रमाणे ते  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक म

जागतिक भांडवलदारांच्या आर्थिक सत्ताकारणाचा भारतीय अर्थ!
महिलांचे संपत्ती वाटपातील स्थान
संगतीमधील विसंगती

जितेंद्र सतीश आव्हाड हे सध्या महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्याचप्रमाणे ते  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे नेते देखील आहेत. ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आहेत. फुले- शाहू- आंबेडकर विचारांचे प्रदर्शन त्यांच्या वाणीतून नेहमी होते. महारष्ट्राचे पुरोगामीत्व जणू त्यांच्या नसानसात भिनलेले आहे की  काय अशी शंका येते. ते माध्यमांशी बोलतांना नेहमी फुले- आंबेडकर विचारधारा व्यक्त करतात. पण जितेंद्र आव्हाड खरेच फुले- आंबेडकर विचारधारेचे आहेत का? असा प्रश्न त्यांना जर कुणी विचारला तर? ते समोरच्याला अडकित्यात पकडल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की. किंबहुना ते असे देखील म्हणू शकतात की, माझी छाती जरी मी फाडून दाखवली तरी त्यात तुम्हाला फुले आंबेडकर दिसतील. काल २० नोव्हेंबर रोजी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त रविवारी चवदार तळे सत्याग्रहाचा ९५ वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा करण्यात आला. या सोहळ्याला जितेंद्र आव्हाड आवर्जून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, गंगेच्या पाण्यापेक्षा चवदार तळ्याचे पाणी जास्त शक्तिशाली आहे. गंगेत डुबकी मारून जेव्हडी शक्ती मिळते त्यापेक्षा जास्त शक्ती चवदार तळ्यातील पाण्यात मारल्यावर मिळते. हे जितेंद्र आव्हाड यांचे विधान त्यांनी भक्तिभावे किंबहुना श्रद्धेपोटी म्हटले असले तरी यातून एक निश्चित तर्क निघतो, तो म्हणजे ‘जितेंद्र आव्हाड यांच्या ज्ञानाला जात- धर्माच्या मर्यादा आहेत. त्यांच्या धर्मचलित मेंदूची चिकित्सा किंबहुना त्याचा उहापोह करणे हे खऱ्या फुले- आंबेडकरी विचारधारेच्या व्यक्तीला नक्कीच अपेक्षित आहे.
मागे काही दिवसापूर्वी म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत आपले भगवे वादळ दाखवत हजारो शिवसैनिकांसोबत अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं होत. त्याचवेळी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. मुंबईत राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत ‘संविधान बचाव रॅली’ काढण्यात आली होती. तेव्हा ‘संविधान बचाव रॅली’ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या रॅलीत महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, कन्हैया कुमार सारखे युवा संघटनामधील महत्वाचे चेहरे सहभागी होते. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, सभारताचे संविधान धोक्यात आहे. पण ते कुणापासून धोक्यात आहे? आणि ते कसे धोक्यात आहे? याचे उत्तर त्यांनी दिले नव्हते. दरम्यान भाजप आणि आरएसएस यांच्यावर आव्हाडांचा रोख होता हेही खरे. पण या रॅलीत या सर्व मंडळींनी संविधानाची पालखीमधून मिरवणूक काढली होती. त्या पालखीचे भोई खुद्द जितेंद्र आव्हाड झाले होते. आता आपल्याकडे पालखीमधून देवीची किंवा देवांची मिरवणूक काढली जाते. तर आता खऱ्या संविधानप्रेमीला संविधानाची पालखीमधून मिरवणूक काढणे आवडेल काय? किंबहुना सेक्युलर असलेल्या संविधानाची हे महोदय जेव्हा पालखीतून मिरवणूक काढतात तेव्हा ते या विज्ञानवादी, धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलर असलेले संविधान याला बाधा पोहचवीत नाहीत काय? संविधानाची त्यांनी तेव्हा पालखीतून मिरवणूक काढली हे त्यांचे कृत्य धार्मिक नेणिवेतून झालेले होते. याचाच सरळ सरळ अर्थ असा निघतो की, जितेंद्र आव्हाड यांच्या ज्ञानाला जात- धर्माच्या मर्यादा आहेत.
काल चवदार तळ्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य धर्म आणि जात मजबुतीसाठी वापरले नाही का? असे असेल तर जितेंद्र आव्हाड हे जातीयवादी आहेत किंवा नाहीत हे तपासावे लागेल. ‘गंगेच्या पाण्यापेक्षा चवदार तळ्याचे पाणी जास्त शक्तिशाली आहे, गंगेत डुबकी मारून जेव्हडी शक्ती मिळते त्यापेक्षा जास्त शक्ती चवदार तळ्यातील पाण्यात मारल्यावर मिळते.’ हे जर त्यांचे वक्तव्य खरे असते तर, त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी रोज चवदार तळ्याच्या पाण्यात जाऊन डुबक्या मारल्या असत्या. त्यात अजित पवारही मागे राहिले नसते. जितेंद्र आव्हाड जे वक्तव्य करतात आणि त्याला पुरोगामित्वाची झालर लावतात ते असले त्यांचे पोकळ वक्तव्य सेक्युलय विचाराच्या चाळणीतून बाजूला पडते, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या मेंदूचे  बौद्धिक पुनर्भरण व्हावे! ही अपेक्षा.

COMMENTS