परळी शहरातील रेहाना नगर परिसरात असलेल्या डायमंड फुटवेअर कारखान्याला काल पहाटे सुमारे 3:15 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगी

परळी शहरातील रेहाना नगर परिसरात असलेल्या डायमंड फुटवेअर कारखान्याला काल पहाटे सुमारे 3:15 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखान्यातील मोठ्या प्रमाणावर कच्चा माल, मशिनरी तसेच चप्पलांचे तयार साठे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कारखान्यात चप्पलांचे मोठे गोडाऊन असून त्यामध्ये पेपर बॉक्सचा मोठ्या प्रमाणावर साठा होता. त्यामुळे आग काही क्षणातच भडकली आणि संपूर्ण परिसरात पसरली. आगीच्या तीव्रतेमुळे कारखान्यातील यंत्रसामग्रीही पूर्णपणे नष्ट झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला कळविण्यात आले. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळीही अग्निशामक दल घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अखेर आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील एका रेझिन कापड दुकानालाही आग लागल्याची घटना घडली होती. त्या वेळीही अग्निशामक दल वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. हा मुद्दा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही उपस्थित करण्यात आला होता. तरीदेखील पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या अग्निशामक गाडीत पुरेसे पाणी नसल्याचे समोर आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना स्वतःच्या घरांमधून पाणी आणून गाडी चालू ठेवावी लागली. ही बाब अत्यंत धक्कादायक असून नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. एकूणच, सलग घडणार्या अशा घटनांमुळे परळी नगर परिषदेच्या अग्निशामक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा उघड झाल्या असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

COMMENTS