मुंबई : राज्य शासन आणि 'अॅग्रेको इंडिया' (Aggreko India) कंपनीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पु

मुंबई : राज्य शासन आणि ‘अॅग्रेको इंडिया’ (Aggreko India) कंपनीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षांत सुमारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास १ हजार थेट रोजगारांची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्यासोबतच आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य करारप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, अॅग्रेको इंडियाचे संचालक सनी ठकरार, ग्रुप प्रमुख स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक राहुल खरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे आता ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’चे (GCC) महत्त्वाचे केंद्र बनत असून या क्षेत्रात अॅग्रेको कंपनीचे स्वागत आहे.
‘अॅग्रेको इंडिया’ ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना (Energy and Temperature Control) क्षेत्रात कार्यरत आहे. आज झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी व उत्पादन केंद्र (Engineering and Manufacturing Center) उभारले जाणार असून त्याचे काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे केंद्र स्कॉटलंडबाहेरील अॅग्रेकोचे सर्वात महत्त्वाचे जागतिक केंद्र असेल. या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

COMMENTS