बीड: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्ह्याच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधू

बीड: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्ह्याच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून एक विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे (नाशिक) यांचे ‘छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे आरक्षणाविषयी तत्कालीन धोरण व आजची परिस्थिती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता नगर रोडवरील हॉटेल नीलकमल येथे पार पडणार आहे. या व्याख्यानास शाहू-फुले-आंबेडकर प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक तथा समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस एड. सुभाष राऊत यांनी केले आहे.
महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त उपक्रम
समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून आणि माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ हे वर्ष ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या अंतर्गत वर्षभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यापूर्वी भिडे वाड्यातील पहिल्या मुलींच्या शाळेचा चित्ररथ बीडमध्ये आणण्यात आला होता आणि आता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस प्रा. सत्संग मुंडे, तुलसी समूहाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत, साहित्यिक डॉ. सतीश साळुंके, परीट समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष गणेश जगताप, नगरसेविका सावित्री नितीन साखरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश उगले, शहराध्यक्ष नितीन राऊत यांच्यासह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

COMMENTS