मुंबई : मुंबईतील घाटकोपरच्या अशोकनगर परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे साकीनाका गौसिया चाळ परिसरात डोंगराचा क

मुंबई : मुंबईतील घाटकोपरच्या अशोकनगर परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे साकीनाका गौसिया चाळ परिसरात डोंगराचा काही भाग अचानक कोसळला. ही दरड दोन ते तीन घरांवर कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटना पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ, मुंबई पोलीस आणि महापालिकेची पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.दरम्यान, आतापर्यंत दोन मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून, आणखी चार ते पाच जण अडकले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची माहितीही समोर आली आहे.मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग अचानक कोसळल्याने घरांवर माती आणि दगडांचा मोठा ढिगारा आला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.सध्या एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, बचावकार्य पूर्ण होईपर्यंत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील डोंगर उतार आणि धोकादायक भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

COMMENTS