Homeताज्या बातम्या

लेंडी प्रकल्पातील निकृष्ट कामांची चौकशी; त्रिसदस्यीय समितीची स्थापनाशिवसेना (ठाकरे) आंदोलनाचा दणका; 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बहुप्रतीक्षित लेंडी सिंचन प्रकल्पातील घळभरणीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य व

शिवाजी कोण होता? पुस्तक वाचनापूर्वीच प्रकाशक प्रशांत आंबी स्थानबद्ध; बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई!
मालेगावात उर्दू फलकांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; सकल हिंदू समाजाच्या ‘जन आक्रोश मोर्चा’मुळे शहरात खळबळ.
नोएडामध्ये कामगारांच्या आंदोलनामुळे वाहतुकीचा बोजवारा



महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बहुप्रतीक्षित लेंडी सिंचन प्रकल्पातील घळभरणीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याच्या आरोपांची गंभीर दखल घेत जलसंपदा विभागाने चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. मुख्य अभियंता अरुण नाईक यांनी याबाबत लेखी आदेश काढून समितीला 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
लेंडी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून सध्या घळभरणीचे काम सुरू आहे. या कामासाठी पूर्वानुभव नसलेल्या कंत्राटदाराला काम देण्यात आल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. तसेच मुळे कंपनीने टाकून दिलेले निकृष्ट दर्जाचे माती, मुरूम, दगड व रेती यांसारखे साहित्य वापरून काम करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्कालीन कार्यकारी अभियंता चौगुले, उपअभियंता जाधव तसेच सुजाता कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. या मागणीसाठी नांदेड येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण, निदर्शने आणि हलगी बजाव आंदोलन करण्यात आले. तसेच देगलूर येथील लेंडी प्रकल्प कार्यालयासमोर भरपावसात सकाळी 11 ते रात्री 7 वाजेपर्यंत जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत मुख्य अभियंता अरुण नाईक यांनी इलियास मु. चिश्ती यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीत कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड यांचा सदस्य म्हणून, तर लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रणव मुदगल यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशीत गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी आणि सुजाता कन्स्ट्रक्शन कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, चौकशी निष्पक्ष झाली नाही किंवा दोषींना वाचविण्याचा प्रयत्न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण तसेच देगलूर येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, विधानसभा प्रमुख पांडुरंग पाटील थडके, शहरप्रमुख भगवान जाधव, मष्णाजी पैलावार, युवासेना तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमुरकर, शहरप्रमुख विनोद सोनकांबळे आणि इतर पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

COMMENTS