माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी आपल्या कार्यरत शाळेच्या गावातच वास्तव्यास राहावे, यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र धो
माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी आपल्या कार्यरत शाळेच्या गावातच वास्तव्यास राहावे, यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र धोरण तयार करून त्याची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संपादक परमेश्वर सोळंके व संपादक संतोष रासवे यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी, पालकांशी आणि ग्रामस्थांशी सातत्याने संपर्क राहणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षक कार्यरत गावातच वास्तव्यास असल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींकडे अधिक प्रभावीपणे लक्ष देता येईल. तसेच पालकांशी नियमित संवाद साधता येऊन शाळेतील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम अधिक सक्षमपणे राबविता येतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शाळा आणि गाव यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी कार्यरत शाळेच्या गावातच वास्तव्यास राहणे आवश्यक असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने याबाबत स्वतंत्र धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेला अधिक बळकटी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS