बीड: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये 15 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीप

बीड: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये 15 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश (जमावबंदी व शस्त्रबंदी) लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलने, मोर्चे किंवा उपोषणे होण्याची शक्यता असते. यातून अचानक तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक, बीड यांच्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आले असून, ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत बीड जिल्ह्याच्या हद्दीत अंमलात राहतील.
शस्त्रे, सोटे, तलवारी, बंदुका, काठ्या किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकतील अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगणे. कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणे. दगड, क्षेपणास्त्रे किंवा ती फेकण्याची उपकरणे गोळा करणे अथवा बाळगणे. प्रक्षोभक भाषणे करणे, विडंबनात्मक नकला करणे, तसेच जिल्ह्याच्या सुरक्षेस व सभ्यतेला बाधा आणणारे फलक किंवा चिन्हे जवळ बाळगणे. संविधानातील मूल्यांच्या विरुद्ध आणि देशाच्या सार्वभौमत्वाला व सामाजिक सलोख्याला बाधा आणणार्या घोषणा देणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे. व्यक्ती, शव, आकृती किंवा प्रतिमांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे. पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, सभा घेणे, मिरवणूक किंवा मोर्चा काढणे. हे आदेश विशेष परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू राहणार नाहीत. मात्र, कोणत्याही प्रकारचा मोर्चा, सभा किंवा तत्सम कृती करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकार्याची पूर्वमान्यता घेणे बंधनकारक राहील, असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

COMMENTS