मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, सातारा
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, रत्नागिरी तसेच घाटमाथा परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक भागांतील नागरिकांना घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे.
मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले असून अंधेरी भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागांत दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, रेल्वे सेवा विस्कळीत होणे आणि नदी-नाल्यांना पूर येण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. राज्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. दुपारनंतर ताशी सुमारे 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक खासगी आस्थापनांनी कर्मचार्यांना घरातूनच काम करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी समुद्रकिनारे, धबधबे, घाट परिसर तसेच पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सततचा पाऊस आणि जोरदार वार्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळत आहेत. एका दिवसात शेकडो झाडे पडल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक रस्ते काही काळ बंद ठेवावे लागले असून वीजपुरवठाही काही भागांत खंडित झाला आहे. महानगरपालिकेने नागरिकांना झाडांखाली, जुन्या इमारतींजवळ किंवा उघड्या जागेत थांबणे टाळण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वार्यामुळे फलक, पत्रे किंवा इतर वस्तू उडून अपघात होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईतील अंधेरी येथील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणांकडून जलदगतीने उपसा सुरू असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
लोकल रेल्वे सेवा विस्कळीत
नालासोपारा आणि वसईदरम्यान उपनगरी रेल्वे सेवा काही काळ ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. काही प्रवाशांना रेल्वे रुळांवरून चालत सुरक्षित ठिकाणी जावे लागले.
विधानसभेतही पावसाच्या परिस्थितीवर चर्चा
मुंबईसह राज्यातील विविध दुर्घटनांमुळे विधानसभेतही हा विषय गाजला. विरोधकांनी सरकारकडे विविध घटनांबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीच्या काळात राजकारणापेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे सांगत परिस्थितीवर सविस्तर निवेदन सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
आळंदीत येऊ नका, वारकर्यांना प्रशासनाचे आवाहन
आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीने धोक्याची मर्यादा ओलांडली असून शहराला महापुराचा विळखा पडला आहे. नदीवरील सर्व पूल पाण्याखाली गेल्याने आळंदीचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत आळंदीत येऊ नये, असे तातडीचे आवाहन केले आहे. इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक वारकरी धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकून पडले होते. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुमारे 250 वारकर्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

COMMENTS