नांदेड : नांदेड काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, गटबाजी आणि संघटनात्मक बदलांच्या मागण्यांचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचले असले, तरी काँग्रेस हायकमां

नांदेड : नांदेड काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, गटबाजी आणि संघटनात्मक बदलांच्या मागण्यांचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचले असले, तरी काँग्रेस हायकमांडने सध्या तरी पक्षात स्थैर्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीविरोधात नाराज असलेल्या काही वरिष्ठ पदाधिकार्यांनी दिल्ली गाठून तक्रारींचा पाढा वाचला होता. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने या तक्रारींना फारसे महत्त्व न देता सपकाळ यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.
नांदेड जिल्ह्यातील काही नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघटनात्मक नियुक्त्या आणि निर्णयप्रक्रियेवरून प्रदेश नेतृत्वाविषयी नाराजी होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या राजकीय समीकरणांना बळ देण्यासाठी जिल्हा पातळीवर तातडीने फेरबदल करण्यात यावेत, असा या नाराज गटाचा आग्रह होता. या दबावामुळे पक्षात संघटनात्मक भूकंप होईल, अशी जोरदार चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू होती.
मात्र, दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाने कोणताही घाईघाईचा निर्णय घेण्यास किंवा दबावाच्या राजकारणाला बळी पडण्यास नकार दिला आहे. विद्यमान पदाधिकार्यांना आणखी किमान सहा महिने काम करण्याची संधी देण्यात यावी, अशी भूमिका हायकमांडने घेतली आहे. हायकमांडच्या या भूमिकेमुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे पक्ष संघटनेतील स्थान अधिक मजबूत झाले असून, त्यांच्या विरोधात मोहीम उघडणाऱ्या बंडखोर गटाची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर कोणताही अंतर्गत वाद न वाढवता पक्षात स्थैर्य राखण्याची रणनीती काँग्रेसने स्वीकारल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

COMMENTS