मुंबई: शासकीय कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड तंत्रज्ञान आणि डेटा सेंटरचा प्रभावी वापर

मुंबई: शासकीय कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड तंत्रज्ञान आणि डेटा सेंटरचा प्रभावी वापर करण्यावर राज्य शासन भर देत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत महाराष्ट्राला एआयच्या वापरात देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मंत्रालयात सुरू करण्यात आलेल्या ‘टेक थर्सडे’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, देशातील सुमारे ५० ते ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आणि एआय पायाभूत सुविधा महाराष्ट्रात असून हे नेतृत्व कायम ठेवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक ‘ग्रीन डेटा सेंटर’ उभारणीसाठी अक्षय ऊर्जेचा वापर, तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराला प्राधान्य दिले जात आहे.
शासकीय माहितीची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘महा एआय’ आणि ‘सर्वम’ यांसारखी एआय मॉडेल राज्याच्या स्वतःच्या सर्व्हर आणि जीपीयू पायाभूत सुविधांवर कार्यरत असल्याने संवेदनशील शासकीय माहिती बाह्य क्लाउड किंवा परदेशी सर्व्हरवर जाणार नाही.
कृषी क्षेत्रात ‘ॲग्री स्टॅक’च्या माध्यमातून १ कोटींहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत एआय-आधारित ‘व्हॉईस बॉट’द्वारे मार्गदर्शन पोहोचविले जात असून, नंदुरबारसारख्या भागातील शेतकऱ्यांना भिल्ली भाषेतही सल्ला उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS