कोपरगाव : दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपल्या मनाविरुद्ध सतत अनेक गोष्टी घडत असतात. अशा वेळी प्रत्येकाने नियमित व्यायाम आणि योगोपासना करावी तसेच आहा

कोपरगाव : दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपल्या मनाविरुद्ध सतत अनेक गोष्टी घडत असतात. अशा वेळी प्रत्येकाने नियमित व्यायाम आणि योगोपासना करावी तसेच आहाराचे संतुलन ठेवावे; त्यातूनच मनुष्याचे आरोग्य सुधारते, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले.
तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पदाधिकारी आणि कामगार बांधवांसाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. संजीवनी युवा प्रतिष्ठान व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल (कोपरगाव) यांच्या सहकार्याने मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक त्र्यंबकराव सरोदे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे आणि साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. साहिल माळी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वाढता रक्तदाब आणि मधुमेह यांमुळे शरीराची मोठी हानी होते, म्हणूनच नियमित तपासणी व वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अध्यक्षीय भाषणात बोलताना त्र्यंबकराव सरोदे म्हणाले की, माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे यांनी प्रत्येक आपत्तीच्या काळात कारखान्याच्या माध्यमातून जनतेला मोठी मदत केली आहे. तोच सामाजिक वारसा बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि आमदार विवेक कोल्हे पुढे चालवत आहेत. या आरोग्य शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी संचालक राजेंद्र कोळपे, सोपानराव पानगव्हाणे, बापूसाहेब औताडे, रामभाऊ कासार, महेश रक्ताटे, सीओओ शिवाकुमार, संजीव पवार, विशाल वाजपेयी, डॉ. उबाळे यांच्यासह विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS