बीड : तळेगाव येथील आदिवासी पारधी वस्तीवर अखेर प्रशासनाच्या सहकार्याने विजेचा प्रकाश पोहोचला आहे. महावितरण बीड, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आदिवासी

बीड : तळेगाव येथील आदिवासी पारधी वस्तीवर अखेर प्रशासनाच्या सहकार्याने विजेचा प्रकाश पोहोचला आहे. महावितरण बीड, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आदिवासी विभागाच्या सहकार्याने तब्बल तीन किलोमीटर अंतरावरून वीज खांब व डीपी उभारून वीज जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या अंधारात राहणार्या पारधी समाजबांधवांच्या घरात प्रथमच विद्युत प्रकाश पडला असून त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलला आहे.
आदिवासी पारधी समाजातील अनेक कुटुंबे यापूर्वी बीड शहरातील रस्त्यांवर राहून आपली उपजीविका भागवत होती. प्रशासनाच्या सहकार्याने त्यांना तळेगाव येथे घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेलची सुविधाही करण्यात आली. मात्र, वस्तीपासून वीज जोडणीचे अंतर मोठे असल्याने आणि त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्यामुळे वीज उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन संवेदना फेलोच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. तत्त्वशील कांबळे यांनी महावितरण प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून पारधी वस्तीवर वीज पोहोचविण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विशेष पुढाकार घेतला. त्यांनी एका दिवसातच तळेगाव येथील पारधी वस्तीवर मीटर बसविण्याचे आदेश दिले. यानंतर गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अधीक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या पथकाने प्रत्यक्ष वस्तीवर जाऊन वीज मीटर बसवून घेतले. यावेळी महावितरणचे लेखाधिकारी प्रदीप वाघमोडे, तळेगावचे लाईनमन शेख रफिकभाई, सामाजिक कार्यकर्ते संतोष निकाळजे तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, बीडचे अध्यक्ष तत्त्वशील कांबळे उपस्थित होते. मीटर बसवल्यानंतर अधीक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत यांनी स्वतःच्या पुढाकारातून बल्ब, बोर्ड आदी साहित्याचा खर्च करून वस्तीवर प्रकाशाची व्यवस्था केली. घरात पहिल्यांदाच स्वतःच्या विजेचा प्रकाश पडताच पारधी समाजबांधवांच्या चेहर्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. आजवर दुसर्याच्या प्रकाशावर अवलंबून राहणार्या कुटुंबांना आता स्वतःच्या घरात उजेड मिळाला आहे. पडीक जागेत अंधारात राहावे लागत असल्याने या कुटुंबांना साप, हिंस्र प्राणी आणि इतर संकटांचा सतत सामना करावा लागत होता. काही दिवसांपूर्वी एका लहान बालकावर प्राण्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे संपूर्ण वस्ती सतत भीतीच्या छायेत वावरत होती. वीज उपलब्ध झाल्यामुळे या कुटुंबांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मोठा दिलासा मिळाला आहे.
लवकरच शबरी आवास योजनेतून घरकुलांचे बांधकाम
दरम्यान, या वस्तीवरील कुटुंबांसाठी लवकरच शबरी आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या घरकुलांसाठी दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन तत्त्वशील कांबळे यांनी केले आहे. घरकुल बांधकामासाठी विटा, लोखंड, वाळू, दरवाजे, फरशी तसेच अन्य बांधकाम साहित्याच्या स्वरूपात मदत करता येणार आहे. बीड शहरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या कुटुंबांच्या घरकुलांसाठी शक्य ती मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS