मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोमवारी प्रश्नोत्तराच्या कामकाजादरम्यान जोरदार खडाजंगी झाली. मुख्यमंत्र

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोमवारी प्रश्नोत्तराच्या कामकाजादरम्यान जोरदार खडाजंगी झाली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीतील विभागांची उत्तरे इतर मंत्र्यांकडून दिली जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला घेरले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी थेट सभात्याग करून कामकाजावर बहिष्कार टाकला. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी सरकारवर कडाडून टीका केली. त्यानंतर सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “आज आम्ही सभागृहावर बहिष्कार टाकला. एक नवीन प्रकार या सरकारच्या काळात सुरू झाला आहे. हे मिंधे स्वतःच्या खात्याचा अभ्यास करत नाहीत. उत्तर देता येत नाही म्हणून दुसऱ्या मंत्र्यांवर जबाबदारी देतात. फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात आणि पळून जातात. आमच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यांनी पळ काढला नाही की जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली नाही. जी खाती रडून घेतली, त्याबाबत त्यांनी स्वतः उत्तर द्यायला हवे.”
विरोधकांच्या या जोरदार गदारोळानंतर आणि आदित्य ठाकरेंच्या थेट हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उभे राहून ठाकरे गटाचा आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, “सभागृहाचे कामकाज नियमाने चालते. काल जोर का झटका दिला, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मी पुढे आणखी झटके देणार आहे.” तसेच, “कोण होतास तू, काय झालास तू! विजयराव, जयंतराव तुम्ही ज्येष्ठ आहात, काय पोराटोरांचे ऐकता,” असा बोचरा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

COMMENTS