मुदखेड : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांवरून आज तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा धडकला. महाराष्

मुदखेड : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांवरून आज तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा धडकला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, कार्याध्यक्ष तिरुपती कोंढेकर आणि शेतकरी नेते भगवान पाटील मनुरकर प्रामुख्याने सहभागी झाले होते. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली.
मुदखेड तालुक्यात मागील काही काळापासून डिझेल टंचाई, खत व बियाण्यांचा तुटवडा, युरिया खताचे सक्तीचे लिंकिंग, पीक विमा मंजुरीतील अडथळे, पीक कर्जातील समस्या आणि वाढत्या महागाईमुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर शेतकऱ्यांनी हा संतप्त एल्गार पुकारला.
गाढवांवर फलक लावून अनोखे आंदोलन: या मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंदोलनात प्रतीकात्मक स्वरूपात आणलेली गाढवे होती. या गाढवांवर ‘आमच्यासारखे वागू नका’ असे फलक लावून सरकारच्या धोरणांवर आणि प्रशासनाच्या असंवेदनशील भूमिकेवर तीव्र प्रहार करण्यात आला. शेतकऱ्यांशी चाललेल्या प्रशासनाच्या वागणुकीचा हा अनोखा निषेध ठरला.
यावेळी माजी नगरसेवक गोविंद दादा गोपणपल्ले, गंगाधर डांगे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, अविनाश चौदंते, गिरीश कोत्तावार यांच्यासह मुदखेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बालाजी गाडे पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS