Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र काँग्रेस मधील गटबाजी पुन्हा उघड

नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा ः विदर्भातील 24 नेत्यांची मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरील अडचणी काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. पटोले आक्रमक असल्यामुळे त्य

भिमनगरमधील 200 बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड,अत्यावश्यक आणि सुरक्षा किटचे वाटप!
सचिव सुमंत भांगेंकडून मुख्य सचिवांची दिशाभूल
तुम्ही सावरा ; आम्ही सर्वतोपरी मदत करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरील अडचणी काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. पटोले आक्रमक असल्यामुळे त्याचा राज्यात काँगे्रसला फायदा होत असला तरी, पक्षार्तंगतील गटबाजी रोखण्यात त्यांना अपयश येतांना दिसून येत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकींच्या निमित्ताने काँगे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पटोले यांच्यावर तोफ डागत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले होते. मात्र त्यानंतर त्यांचे मनोमिलन झाले. मात्र तरी देखील विदर्भातील काँगे्रसच्या 24 नेत्यांनी नाना पटोले यांना काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केल्यामुळे पुन्हा एकदा गटबाजी उघड झाली आहे.

काँग्रेसचे निरीक्षक रमेश चेन्निथला यांची या नेत्यांनी भेट घेतली. त्यांच्याकडे पटोले यांना हटवा आणि शिवाजीराव मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस निरीक्षक रमेश चेन्निथला यांची मुंबईत विदर्भातल्या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी काँग्रेस समितीचे सचिव रहमान खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, इक्राम हुसैन, सरदार महेंद्र सिंह सलूजा यांच्यासह जवळपास दोन डझन पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी यावेळी पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा, अशी मागणी केली. तसेच हीच मागणी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनात हायकमांडकडे करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. नाना पटोले यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ते कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांच्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसच्या व्होटबँकेला पक्षापासून दूर ठेवले आहे. दलित, मुस्लीम यांना दूर लोटण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना हटवा, अशी मागणी शिवाजीराव मोघे यांच्या समर्थकांनी काँग्रेस निरीक्षक रमेश चेन्निथला यांच्याकडे केली आहे. ते आता काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाल्याचे समोर येत आहे. यापूर्वी विधान परिषद निवडणुकीत नाशिकच्या तिकीट वाटपावरून घोळ घालण्यात आला. त्यामुळे सत्यजित तांबे या तरुण नेत्याने बंड केले. ते पक्षाच्या पाठिंब्याशिवाय निवडून आले. त्यानंतर त्यांनी थेट नाना पटोले यांच्याविरोधात एक पत्रकार परिषद घेत जोरदार आरोप करत त्यांना तिकीट वाटप घोळाला जबाबदार धरले. बाळासाहेब थोरातही याच दरम्यान नाराज होते. हे प्रकरण संपते न संपते तोच नाना पटोले यांच्याविरोधात पुन्हा एक गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूस काही केल्या कमी होताना दिसत नाही.

‘काँग्रेस कार्यकारिणी’ची निवडणूक नाहीच – काँगे्रसचे 85 वे अधिवेशन छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात प्रामुख्याने  2024 लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती, पक्षासमोर आव्हाने, विरोधकांच्या एकजुटीचा मुद्दा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.तसेच काँग्रेस कार्यकारिणी समिती निवडणुकीबाबतही निर्णय घेण्यात येणार होता, त्यानुसार ही निवडणूक होणार नसल्याचे आता ठरले आहे. काँग्रेस नेतृत्वाने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षाच्या संचालन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ज्यामध्ये गांधी कुटुंबातील सदस्यांनी सहभाग घेतला नाही. संचालन समितीची ही बैठक जवळपास तीन तास सुरू होती.

COMMENTS