शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : मंत्री दादाजी भुसे नंदुरबार : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आण

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : मंत्री दादाजी भुसे
नंदुरबार : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त नागरिक घडला पाहिजे. शिक्षण हाच दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांच्या प्रगतीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या शुभारंभानिमित्त आणि प्रवेशोत्सव-आनंदोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील दुर्गम तोरणमाळ येथील ‘नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालया’त विद्यार्थ्यांचे स्वागत करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबईच्या उपसंचालिका भावना राजूरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात प्रवेशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा आनंद पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. तोरणमाळ येथील निवासी विद्यालयाचा विशेष उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, २० शाळांचे एकत्रीकरण करून उभारण्यात आलेले हे शिक्षण केंद्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असून, दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी यांनी स्वतःच्या जुळ्या मुलांना शासकीय शाळेत प्रवेश देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगत शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या या निर्णयाचे विशेष कौतुक केले. शासनाच्या शाळांबाबत समाजामध्ये विश्वास निर्माण करणारे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांबाबत बोलताना श्री. भुसे यांनी निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बेड, शुद्ध पिण्याचे पाणी, सौरऊर्जा यंत्रणा आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा येत्या सहा महिन्यांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्यासाठी दरमहा आरोग्य तपासणी करण्यात येईल आणि शाळेसाठी रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS