कडा: सध्या मान्सूनचा लपंडाव सुरू असल्याने यंदाचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी जून महिन्याच्या याच कालावधीत राज्यातील तब्बल ९

कडा: सध्या मान्सूनचा लपंडाव सुरू असल्याने यंदाचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी जून महिन्याच्या याच कालावधीत राज्यातील तब्बल ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र, यंदा जून संपत आला तरी बहुतांश भागांत पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला असून अजून चाड्यावर मूठ देखील पडलेली ना
गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाने सुरुवातीलाच जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत पेरण्या आटोपल्या होत्या. २२ ते २५ जूनपर्यंत राज्यातील ९० टक्के पेरण्या पूर्ण होऊन पिके अंकुरली सुद्धा होती. याउलट, यंदा जून महिना संपत आला तरी अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. काही भागांत केवळ नावापुरती हजेरी लावून पाऊस गायब झाला आहे.
पेरण्या लांबल्यामुळे मुख्य पिकांच्या सोयाबीन, कापूस, मका आणि तूर उत्पादनावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. बियाणांचा कालावधी बदलल्यास उत्पन्नात घट येते, असा पूर्वानुभव आहे. आधीच महागाई आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे खचलेला शेतकरी आता चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. पुढील आठवड्यात जर दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
जमिनीत योग्य ओल झाल्यावरच पेरणी करा: कृषी विभाग
शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय घाईघाईने पेरण्या करू नये, जमिनीत योग्य ओल झाल्यावरच पेरण्या कराव्यात, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिला आहे. मागच्या वर्षी याच काळात ९० टक्के पेरण्या झाल्या होत्या, मात्र आता जून संपत आला तरी देखील एक टक्काही पेरणी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS