देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील जातप येथील कन्हैया मंगल कार्यालयात हळदी कार्यक्रमादरम्यान जुन्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्या

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील जातप येथील कन्हैया मंगल कार्यालयात हळदी कार्यक्रमादरम्यान जुन्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या फिर्यादीनुसार, युवराज तनपुरे (रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा सागर ज्ञानदेव गडाख व रामेश्वर उर्फ दादासाहेब हंसराज गडाख यांच्याशी जुना वाद आहे. दि. 8 मे 2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते जातप येथील कन्हैया लॉन्स येथे हळदी कार्यक्रमासाठी गेले असता आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. तू एवढ्या लवकर जमिनीवर कसा काय बाहेर आला असे म्हणत वाद घालत हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच रामेश्वर गडाख यांनी गावठी कट्टा पोटाला लावून धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सागर गडाख यांनी फिर्यादीच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर युवराज तनपुरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दुसर्या बाजूने रविंद्र रघुनाथ गडाख (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री साडेआठच्या सुमारास हळदी कार्यक्रमादरम्यान युवराज तनपुरे व त्याच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून रामेश्वर गडाख व सागर गडाख यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, रामेश्वर गडाख यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळ्यांची तर सागर गडाख यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चैन आरोपींनी हिसकावून घेतली. घटना घडल्यानंतर आरोपी चारचाकी वाहनातून पसार झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS