अकोला जिल्ह्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांचा मुद्दा अधिक गंभीर होत असून, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आणखी दोन बियाणे कंपन्यां

अकोला जिल्ह्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांचा मुद्दा अधिक गंभीर होत असून, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आणखी दोन बियाणे कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कारवाई झालेल्या बियाणे कंपन्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे.शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवले नसल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाने विविध ठिकाणांहून बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. तपासणी अहवालात अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने संबंधित कंपन्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.मंगळवारी उशिरा अकोला सिटी कोतवाली आणि बाळापूर पोलीस ठाण्यात आणखी दोन बियाणे कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. यापूर्वी आठ दिवसांपूर्वी दोन कंपन्यांवर, तर त्यानंतर नऊ कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता नव्याने दोन कंपन्यांवर कारवाई झाल्याने जिल्ह्यात एकूण १३ बियाणे कंपन्यांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये आतापर्यंत १३ ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, निकृष्ट बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.दरम्यान, कृषी विभागाकडून संबंधित प्रकरणांचा पुढील तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS