किनवट : किनवट-मांडवा मार्गावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाची हक्काची स्वतंत्र इमारत दोन-तीन दिवसांपूर्वी जेसीबी लावून पूर्णपणे भुईसपाट करण्य

किनवट : किनवट-मांडवा मार्गावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाची हक्काची स्वतंत्र इमारत दोन-तीन दिवसांपूर्वी जेसीबी लावून पूर्णपणे भुईसपाट करण्यात आली आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे ही शासकीय इमारत नेमकी कोणी आणि कोणाच्या आदेशाने पाडली, याबाबत स्वतः भूमी अभिलेख विभागच अंधारात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या प्रकारामागे कोट्यवधी रुपये किमतीचा शासकीय भूखंड हडप करण्याचा मोठा कट असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
अंदाजे २७ वर्षांपूर्वी शासनाने जमीनधारकाला ७५ लाख रुपयांचा मावेजा देऊन ५ गुंठे जागा खरेदी केली होती आणि त्यावर लाखो रुपये खर्च करून ही इमारत उभारली होती. मात्र, बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे पावसाळ्यात इमारत गळत असल्याने, कार्यालयीन रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी हे कार्यालय काही काळ भाड्याच्या इमारतीत आणि त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात स्थलांतरित करण्यात आले होते. नियमानुसार, कोणत्याही शासकीय इमारतीचे निर्लेखन (Condemnation) करण्यासाठी रीतसर कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. मात्र, अशी कोणतीही परवानगी न घेता थेट इमारतच जमीनदोस्त करण्यात आली.
सूत्रांनुसार, इमारत पाडल्यानंतर त्यातील लोखंड, खिडक्या, दरवाजे आणि इतर मौल्यवान साहित्याचे भंगारही चोरट्या मार्गाने विकून लाखो रुपये खिशात घालण्यात आले आहेत. या गंभीर प्रकरणाबाबत भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक महेंद्र गंभिरे यांच्याशी संपर्क साधला असता, “उभी असलेली इमारत पाडण्यात आल्याची कोणतीही माहिती मला नाही,” असे अजब उत्तर त्यांनी दिले. विभागाच्या प्रमुखालाच आपल्या इमारतीबाबत माहिती नसल्याने संशय अधिक बळावला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी किनवटवासीयांकडून केली जात आहे.

COMMENTS