डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजुरी वेस ते बलभीम चौक या महत्त्वाच्या रस्त्यावर रात्रीतून टाकण्यात आलेल्या खडीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले असून अनेक जण जखमी होत आहेत.
या रस्त्यावर अचानक टाकलेल्या सैल खडीमुळे वाहनांचे संतुलन बिघडत आहे. विशेषतः महिला व तरुणी मोठ्या प्रमाणात घसरून पडत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जयंतीनिमित्त रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असले तरी ती नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने होणे गरजेचे होते. केवळ खडी टाकून काम उरकण्यापेक्षा डांबर मिश्रित खडी टाकून खड्डे बुजविणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले. नगरपरिषदेच्या या कामामुळे भीम अनुयायी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष वाढत असून, तात्काळ योग्य दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS