Homeताज्या बातम्यादेश

राज्यात सरासरी 55 टक्के मतदान

बंगाल, मणिपूरमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट

नवी दिल्ली ः देशातील 102 लोकसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी मतदान घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. पश्‍चिम बंगा

श्री क्षेत्र पंचाळेत सदगुरू गंगागिरी महाराजांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह
चिखली पोलिसांनी केली १० लाखाच्या गुटख्याची होळी
अकोल्यात काढली दोन हजाराच्या नोटेची अंत्ययात्रा

नवी दिल्ली ः देशातील 102 लोकसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी मतदान घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. पश्‍चिम बंगाल आणि मणिपूरमधील घटना सोडता उर्वरित देशभरात शांततेत मतदान पार पडले. मात्र उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे विदर्भात मतदानांची टक्केवारी घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्रात सरासरी 54.85 टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशभरातील 19 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये 102 जागांसाठी मतदान घेण्यात आले. मणिपूर, पश्‍चिम बंगाल आणि नक्षलवाद प्रभावित जिल्ह्यांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पश्‍चिम बंगालमधील तीन मतदारसंघांमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथेही भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही राज्यांमध्ये हिंसाचार करणार्‍यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मणिपूरमध्ये दोन ठिकाणी मतदान केंद्राजवळ गोळीबार झाला. विष्णुपूर जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केंद्राजवळ गोळीबार केल्याने मतदार पळून गेले. यामुळे येथे अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागली. पश्‍चिम इंफाळ जिल्ह्यातही असाच प्रकार घडला. गोळीबार केल्यानंतर शस्त्रधारी हल्लेखोरांनी निवडणूक अधिकार्‍यांनाही दमदाटी करत मतदारकेंद्र सोडून निघून जाण्यास सांगितले. अनेक ठिकाणी निवडणूक साहित्याची तोडफोडही करण्यात आली. पश्‍चिम बंगालमध्ये कूचबिहार, अलिपूरदास आणि जलपाईगुडी या तीन मतदारसंघात हिंसाचार झाला. तृणमूल काँग्रेसने भाजपविरोधात 80, तर भाजपने तृणमूल काँग्रेसविरोधात 39 तक्रारी केल्या. हिंसाचार, मतदारांवर दबाव निर्माण करणे, निवडणूक अधिकार्‍यांना दमदाटी असे आरोप दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर केले. केंद्रीय पोलिस दलातील जवान भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत करत असल्याचा आरोपही तृणमूलच्या नेत्यांनी केला.

नक्षलप्रभावित भागात 3 वाजेपर्यंतच मतदान – नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवायांमुळे नक्षलप्रभावित क्षेत्रामध्ये सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदान घेण्यात आले. यामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी ही चार विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि दुपारी 3 वाजता संपले.

नागालँडमधील 6 जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान – नागालँडमधील 6 जिल्ह्यांमध्ये जवळपास 0% मतदान झाले. हे जिल्हे आहेत- मोन, लाँगलेंग, तुएनसांग, नोक्लाक, शामटोर आणि किफिरे. ते सर्व पूर्व नागालँडमध्ये येतात. ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रशासन आणि अधिक आर्थिक स्वातंत्र्याची मागणी करत आहे. या संघटनेने या जिल्ह्यांतील जनतेला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.

छत्तीसगडमध्ये ग्रेनेडच्या स्फोटात जवान शहीद – छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्ह्यातील पोलिस स्टेशन क्षेत्रातील गलगाम येथे ग्रेनेड स्फोटात जखमी झालेल्या सीआरपीएफ-196 बटालियनचा एक जवान शहीद झाला आहे. देवेंद्र कुमार असे या जवानाचे नाव आहे. दरम्यान, मतदान केंद्रापासून 500 मीटर अंतरावर ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात देवेंद्र कुमार गंभीर जखमी झाले होते, त्यांना एअरलिफ्ट करून पुढील उपचारासाठी जगदलपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान देवेंद्र कुमार शहीद झाले आहेत.  

COMMENTS