पुणे : बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने दरवर्षी केली जाणारी घटमांडणी आणि त्यावर आधारित पावसाचा तसेच वर्षभरातील विविध घडामोडींचा

पुणे : बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने दरवर्षी केली जाणारी घटमांडणी आणि त्यावर आधारित पावसाचा तसेच वर्षभरातील विविध घडामोडींचा अंदाज यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या पद्धतीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खुले आव्हान दिले आहे.
समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी स्पष्ट केले की, कुंडली, पारंपरिक ज्योतिष आणि भेंडवळ येथील घटमांडणी यांद्वारे केले जाणारे अंदाज वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध झालेले नाहीत. त्यांनी सांगितले की, दहा कुंडल्या आणि आवश्यक माहिती देण्यात येईल. त्यापैकी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक भाकिते अचूक ठरवून दाखवली तर 80 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. समितीच्या मते, मागील काही वर्षांत अशा प्रकारच्या अंदाजांपैकी अनेक निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी केवळ या भाकितांवर अवलंबून राहू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. आधुनिक काळात हवामानाचा अंदाज हा अभ्यास, निरीक्षण आणि विज्ञानाधारित साधनांवर आधारित असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. श्याम मानव यांनी असेही नमूद केले की, पूर्वी शेतकरी अनुभवाच्या आधारे निर्णय घेत असत; मात्र आता तंत्रज्ञानामुळे अधिक अचूक माहिती उपलब्ध होत आहे. काही ठिकाणी श्रद्धेचा गैरवापर होऊन लोकांची दिशाभूल केली जाते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, भेंडवळ येथील घटमांडणीची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दरवर्षी येथे घट मांडली जाते आणि त्यावरून पावसाचे प्रमाण, पीकस्थिती, तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींचे अंदाज व्यक्त केले जातात. या सोहळ्यासाठी विदर्भ, खान्देश तसेच मध्य प्रदेशातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदाही घटमांडणी पार पडली असून सकाळी त्याचे अंदाज जाहीर करण्यात आले. जागतिक परिस्थिती, महागाई आणि इंधनटंचाई यांसारख्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर या भाकितांकडे अनेकांचे लक्ष लागले होते. घटमांडणीला ठोस शास्त्रीय आधार नसल्याची टीका होत असली, तरी अनेक शेतकर्यांचा या परंपरेवर विश्वास कायम आहे. त्यामुळे परंपरा आणि विज्ञान यांच्यातील हा वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
भेंडवळ भविष्यवाणी काय आहे?
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ इथं दरवर्षी पाऊसाचा अंदाज, त्याचरोबर, राजकीय, सामाजिक अंदाज देखील वर्तवले जातात. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जात आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती, आणि आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत.

COMMENTS