Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार गटाकडून पर्यायी पक्षाचे नाव सादर

निवडणूक आयोगाकडे दिला प्रस्ताव; पक्षचिन्ह देणे टाळले

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रस नेमकी कुणाची, यावरचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठ

विजयसिंह मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश ठरला
शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह द्या
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रस नेमकी कुणाची, यावरचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाने बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर शरद पवार गटाकडून पर्यायी पक्षाच्या नावांची मागणी करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवल्याचे समोर आले आहे. मात्र यासोबतच पक्षचिन्हांच्या नावाचा प्रस्ताव देण्याचे मात्र टाळण्यात आले आहे.

पक्षचिन्ह न पाठवण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे शरद पवार गट पुढील लढाई सर्वोच्च न्यायालयात आक्रमकपद्धतीने लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या नावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या 3 नावांचा समावेश आहे. आता निवडणूक आयोग या तीनपैकी एखादे नाव शरद पवार यांच्या गटाला द्यावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सत्ताधारी अजित पवार गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहे. शरद पवार गटाकडून नवीन चिन्हासाठी ‘कपबशी’, ‘सूर्यफूल’, ‘उगवता सूर्य’,’चष्मा’ या चिन्हांचा विचार करण्यात येत असला तरी, हे चिन्ह निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले नाही.

दरम्यान निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय दिल्यानंतर दुसरीकडे अजित पवार गट सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे असलेल्या बँलार्ड पिअर येथील पक्षाच्या मुख्यालयाचा ताबा अजित पवार गट घेणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण’ हे निवडणूक हे चिन्ह मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनाभवन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नव्हता, तसे अजित पवार गट करणार का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

पक्ष पळवण्याचा प्रश्‍नच कुठे येतो? अजित पवार – विरोधकांकडून पक्ष पळवल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर बोलतांना अजित पवार म्हणाले, पक्ष पळवण्याचा प्रश्‍नच कुठे येतो? कोण काय बोलतो, त्याचा आम्ही विचार करत नाही. मी कुणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाही. आयोगाने आमची बाजू खरी मानली. त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर कोर्टात गेलो असतो. आम्ही राज्याची कामे करण्यासाठी इथे आलो आहोत. नवीन पिढीला बरोबर घेऊन राज्यासाठी कामे करत राहू, असेही अजित पवार म्हणाले.

..तर, लोकशाहीचे अधःपतन ः घटनातज्ज्ञ बापट – निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटतांना दिसून येत आहे. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यासंदर्भात बोलतांना म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निकालामुळे लोकशाहीचे अधःपतन तथा राज्यघटनेचीही पायमल्ली होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतरबंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी बहुमत कुणाचे, पक्षाची घटना काय सांगते, त्या पक्षाच्या मूळ विचारसरणीला धरून कोण वागत आहे व कुणाकडे सर्वाधिक आमदार-खासदार आहेत या सर्व बाबींचा विचार करावा लागेल अशा स्पष्ट शब्दांत सांगितले असल्याचे बापट म्हणाले.

COMMENTS