नांदेड: शहरातील आसना कॉफी पॉईंटजवळील उड्डाणपुलाच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. लाखो रुपये खर्चून उभारण

नांदेड: शहरातील आसना कॉफी पॉईंटजवळील उड्डाणपुलाच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रस्त्याची पावसाळ्यातील दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून या पाण्यातून वाहने चालवावी लागत आहेत.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. अनेक चारचाकी वाहनांमध्येही पाणी शिरत असून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेने या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य निचर्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येक पावसात याच ठिकाणी मोठा जलसाठा होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या दर्जेदार कामांचे दावे करणार्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व वाहनचालक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने साचलेल्या पाण्याचा निचरा करून रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

COMMENTS