नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा मोठ्या राजकीय आंदोलनाने तापली आहे. पंजाबमधील फार्मसीचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप करत भारतीय जनता पक

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा मोठ्या राजकीय आंदोलनाने तापली आहे. पंजाबमधील फार्मसीचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) शेकडो कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हातामध्ये विविध पोस्टर्स घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैन्स यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपाचे हे आंदोलन दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात सुरू आहे. सर्व आंदोलक दिल्लीतील फिरोज शाह रोडवर जमा झाले असून या रस्त्यापासून अवघ्या २०० ते ३०० मीटर अंतरावर ‘आप’चे मध्यवर्ती कार्यालय आहे. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी ‘आप’ कार्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून, आंदोलकांवर लाठीचार्ज करू नये अशा स्पष्ट सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
पंजाबमध्ये १९ जुलै रोजी झालेल्या फार्मसीच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार आणि पेपरफुटी झाल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आंदोलकांनी पंजाब सरकार आणि ‘आप’चे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
स्वाती मालीवाल यांचे गंभीर आरोप
दरम्यान, भाजपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनीही या प्रकरणी ‘आप’ सरकारवर जोरदार निशाणा साधला. “मागील पाच वर्षांत पंजाबमध्ये सहा मोठ्या पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपीची प्रकरणे समोर आली असून ‘आप’ सरकार या कारभारात पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “पंजाबमध्ये ‘सुपर सीएम’ म्हणून काम करणारे अरविंद केजरीवाल या गंभीर विषयावर मौन बाळगून आहेत, तर पंजाबचे मंत्री बेजबाबदार विधाने करत आहेत.” पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैन्स यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

COMMENTS