नवी दिल्ली: नीट (NEET) प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीन

नवी दिल्ली: नीट (NEET) प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणी राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पक्षाने’ या निर्णयाचे स्वागत करत लोकशाहीचा विजय झाल्याचा दावा केला आहे.
राजीनाम्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी प्रतिक्रिया देताना, “सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असे म्हटले जात होते; मात्र लोकशक्तीपुढे सत्तेलाही झुकावे लागते,” असे म्हणत आंदोलनाच्या यशाचा दावा केला. धर्मेंद्र प्रधान यांनी दोन पानांचे राजीनामा पत्र प्रसिद्ध केले असून, त्यात विविध मुद्द्यांसह तरुणांची दिशाभूल झाल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. या पत्रानंतर त्यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी सकाळी दिल्लीत एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधण्याची गरज अधोरेखित केली होती. केवळ आदेश देण्याऐवजी प्रत्येक निर्णयामागील तर्क समजावून सांगणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही तासांतच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्याने या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांना केले बडतर्फ
नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रीय चाचणी संस्थेतील (NTA) ४७ अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीत व्यापक सुधारणा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. परीक्षांच्या सुरक्षिततेसाठी विद्यमान बाह्य सेवा प्रणालीत बदल, अत्याधुनिक तांत्रिक व्यवस्था, प्रश्नपत्रिका गळती रोखण्यासाठी नव्या सुरक्षाव्यवस्थेची उभारणी तसेच संस्थेत वरिष्ठ अधिकारी आणि तरुण व्यावसायिकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
सीजेपीच्या आंदोलनाची सांगता; तिन्ही प्रमुख मागण्या मान्य
कॉकरोच जनता पक्षाने शनिवारी सुरू असलेले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह तसेच पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन समाप्त झाल्याची माहिती दिली.
प्रवक्ते सौरभ दास यांनी जंतर-मंतरवर आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे आभार मानत शांततेने घरी परतण्याचे आवाहन केले. आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तीन टप्प्यांत चर्चा झाली. या चर्चेनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलनादरम्यान दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेणे आणि नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे बाधित विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे, या तिन्ही प्रमुख मागण्या मान्य झाल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींना वेग आला असून, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय नेतृत्वाने त्यांना अचानक दिल्लीला का बोलावले, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह शासकीय महापूजा केली. त्यानंतर दुपारी सुमारे एकच्या सुमारास मुख्यमंत्री सोलापूर येथून विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.

COMMENTS