अंबाजोगाई: येथील नगरपरिषद परिसरातील मुख्य वितरण रोहित्रावर (डीपी) गेल्या अनेक दिवसांपासून अतिरिक्त भार वाढल्याने विजेचा लपंडाव आणि प्रचंड हाय-लो

अंबाजोगाई: येथील नगरपरिषद परिसरातील मुख्य वितरण रोहित्रावर (डीपी) गेल्या अनेक दिवसांपासून अतिरिक्त भार वाढल्याने विजेचा लपंडाव आणि प्रचंड हाय-लो व्होल्टेजचा (कमी-जास्त दाब) त्रास सुरू आहे. या तांत्रिक बिघाडामुळे परिसरातील व्यापारी, नागरिक आणि शासकीय कामांवर अवलंबून असणार्या व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महावितरणच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उपकरणांची जळाली अंतर्गत यंत्रणा; व्यवसायाला मोठा फटका
विजेच्या तीव्र चढ-उतारामुळे परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, संगणक चालक आणि इतर व्यावसायिकांचे संगणक, प्रिंटर्स, झेरॉक्स मशीनमधील महागडे पार्ट जळून खाक झाले आहेत. अनेक दुकानांमधील महावितरणचे स्वतःचे मीटर आणि मुख्य वीजवाहिन्या (वायर्स) देखील जळून गेल्या आहेत. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या छोट्या व्यावसायिकांना आता हजारो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
प्रशासकीय कामांवर परिणाम; नागरिक त्रस्त
नगरपरिषद परिसर हा शासकीय आणि प्रशासकीय कामांचे केंद्र आहे. येथे विविध दाखले, प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती आणि ऑनलाईन कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. मात्र, वीज गायब असणे किंवा व्होल्टेज नसल्यामुळे संगणक आणि झेरॉक्स मशीन बंद पडत आहेत. परिणामी, प्रशासकीय कामात मोठी दिरंगाई होत असून लांबून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
महावितरण ढिम्म; आंदोलनाचा इशारा
या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी व व्यावसायिकांनी महावितरणच्या अधिकार्यांना वारंवार तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु, या डोळे असून आंधळ्या ठरलेल्या प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. महावितरण केवळ वीज बिल वसुलीत तत्परता दाखवते, मग दुरुस्तीच्या कामात ही सुस्ती का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या रोहित्रावरील भार कमी करून नवीन क्षमतेचे रोहित्र तात्काळ न बसवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक व्यावसायिकांनी दिला आहे.

COMMENTS