अहिल्यानगर: नीट (NEET) पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियांवरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा

अहिल्यानगर: नीट (NEET) पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियांवरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी त्यांनी अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील गांधी स्मारकात मौन आंदोलनाला सुरुवात केली. “दडपशाही नव्हे, तर संवाद हवा,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी सरकारला लोकशाही मूल्यांची आठवण करून दिली आहे.
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला २० जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी ही भूमिका घेतली आहे. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी अण्णांनी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर वाडिया पार्कमध्ये पोहोचून मौन आंदोलन सुरू केले. या आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरुपात ‘नगरचे जंतर-मंतर’ नाव देण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावुक झालेले पाहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
आंदोलनापूर्वी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सरकारच्या दडपशाहीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. नीट पेपरफुटी आणि बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाकडे लक्ष वेधताना त्यांनी पत्रात लिहिले की, “विद्यार्थ्यांचे आंदोलन हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून तो लोकभावनेचा विषय आहे. सरकारने दडपशाहीचा मार्ग सोडून विद्यार्थी आणि आंदोलकांशी तत्काळ संवाद साधायला हवा.”
एकीकडे दिल्लीत सोनम वांगचुक आणि विद्यार्थी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे या आंदोलनाला आता मोठे बळ मिळाले असून राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS