बीड: जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच, पारधी समाजातील एका सुशिक्षित महिलेवर अमा

बीड: जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच, पारधी समाजातील एका सुशिक्षित महिलेवर अमानुष जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात महिलेचा एक हात फ्रॅक्चर झाला असून पाठीवर व शरीरावर मारहाणीचे गंभीर वळ उठले आहेत.
पीडित महिला रीता प्रभाकर भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करत अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. तसेच सोन्याचे दागिने व रोख रक्कम हिसकावून घेत जिवे मारण्याचा व बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकरणी सदाशिव रतन काळे, नितीन सदाशिव काळे, गोरख सुरेश भोसले, गोरख सदाशिव काळे, बालाजी सखाराम काळे, संतोष सखाराम काळे, रोहित कालिदास भोसले, कालिदास रामदास भोसले, पद्माबाई सुरेश भोसले, रेखाबाई सखाराम काळे आणि लक्ष्मीबाई गोरख काळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जीव वाचवण्यासाठी उसाच्या शेतात पळ काढल्यामुळे आणि अचानक दोन स्कॉर्पिओ वाहने आल्याने पोलीस आल्याच्या संशयाने आरोपी पळून गेल्याचे पीडितेने सांगितले. या घटनेत राजापूर गावच्या पोलीस पाटलांच्या वडिलांचाही सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पीडितेवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणारे आरोपी हे यापूर्वी ‘एम.पी.डी.’ कायद्यांतर्गत जिल्ह्यातून हद्दपार झालेले गुन्हेगार असून त्यांनी परिसरात पुन्हा दहशत निर्माण केली आहे. इतका गंभीर प्रकार घडल्यानंतर आणि गुन्हा दाखल होऊनही तलवाडा पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. सर्व आरोपी गावात उजळ माथ्याने फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा पीडित महिलेने दिला आहे.

COMMENTS