देगलूर तालुक्यातील गवंडगाव-बोरगाव मार्गावर जेसीबीने उकरून टाकलेला रस्ता आजही पूर्ववत करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार करूनही

देगलूर तालुक्यातील गवंडगाव-बोरगाव मार्गावर जेसीबीने उकरून टाकलेला रस्ता आजही पूर्ववत करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता (जेई) आकाश पाटील यांनी प्रभावी कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गवंडगाव-बोरगाव रस्ता क्रमांक 74 वरील कि.मी. 1/0 ते 1/200 या दरम्यान सुमारे 100 मीटर लांबीचा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उकरून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करूनही संबंधितांविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदार दादाराव पांडुरंग गवंडगावकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार दि. 5 जून 2026 रोजी हा प्रकार घडला. त्यानंतर 6 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. विभागाचे कनिष्ठ अभियंता आकाश पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ना रस्ता पूर्ववत करण्यात आला, ना दोषींवर कारवाई झाली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याप्रकरणी 3 जुलै 2026 रोजी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठीही सूचना देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र आजपर्यंत एफआयआर दाखल न झाल्याने विभागाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात असून, संबंधितांना पाठीशी घातले जात आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दररोज शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांची ये-जा असलेल्या या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून शेतीकामे, पेरणी तसेच दैनंदिन व्यवहारांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी, रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी तक्रारदार दादाराव पांडुरंग गवंडगावकर यांनी केली आहे.

COMMENTS