संगमनेर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे. ही घटना अत्यंत संता

संगमनेर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे. ही घटना अत्यंत संतापजनक असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या विश्वासाला तडा देणारी आहे. लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मेहनतीवर, स्वप्नांवर तसेच भविष्यावर पुन्हा एकदा पाणी फिरल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात थोरात म्हणाले की, भाजपच्या सत्ताकाळात पेपरफुटी ही जणू नित्याची बाब बनली आहे. भरती परीक्षा असो किंवा पात्रता परीक्षा, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो तरुणांचे परिश्रम, वेळ आणि भविष्य धोक्यात आले आहे. शासनाच्या निष्काळजीपणाचा फटका प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून त्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
तरुणांच्या आयुष्याशी असा खेळ करणाऱ्या सरकारला आता जनता ‘पेपरफुटी सरकार’ म्हणून ओळखू लागली असल्याची तीव्र टीकाही त्यांनी केली. सरकारकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, अशी खात्री आता उरलेली नसल्याचे सांगत त्यांनी युवकांच्या आक्रोशाची आणि त्यांच्या वेदनांची शासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली. टीईटी पेपरफुटीप्रकरणी सखोल चौकशी करून या गैरप्रकारामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घ्यावा, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

COMMENTS