कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या अघोषित भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या अघोषित भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होत असून, रात्रीच्या वेळी वीज खंडित होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची तातडीने दखल घेत आमदार विवेक कोल्हे यांनी महावितरण प्रशासनाकडे ग्रामीण भागातील रात्रीचे भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
आमदार कोल्हे यांनी म्हटले आहे की, सध्या शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून विद्यार्थी नियमित अभ्यास, गृहपाठ तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबांकडे पर्यायी प्रकाशव्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याशिवाय, शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही वारंवार होणाऱ्या या भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. बदलत्या हवामानात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन महावितरण प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा व रात्रीचे भारनियमन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी केली आहे. तसेच कोपरगाव तालुक्यात अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS