बीड घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन होत असल्याचा आरोप करत या प्रक

बीड घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (डखढ) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने केलेली कारवाई अपुरी असून मुख्य सूत्रधारांना वाचविण्यात आल्याचा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना आ. पंडित म्हणाले की, गेवराई तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली गोदावरी नदीपात्रात सुमारे 100 कोटी रुपयांच्या अवैध वाळू उपसा सिंडिकेटचे कामकाज सुरू असल्याचे आरोप समोर आले. या प्रकरणात महसूल व पोलीस विभागातील काही कर्मचारी तसेच वाळू माफियांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली. मात्र, सिंडिकेट चालवणारे प्रमुख आरोपी कारवाईच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. श्रीक्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) परिसरातील अवैध वाळू उपसा प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईत बडे मासे वगळण्यात आल्याचे सांगत, या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार आ. पंडित यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, अवैध वाळू उत्खननात सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी आणि त्यांच्या कथित सिंडिकेटविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. हा प्रश्न तडीस जाईपर्यंत आपण मागे हटणार नसून येणार्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहोत. आवश्यक वाटल्यास न्यायालयातही दाद मागण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात संबंधित तहसीलदारांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

COMMENTS