नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच 'NEET' पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण देशासह महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘NEET’ पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण देशासह महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. लातूरमध्ये आज राष्ट्रीय विद्यार्थी संघटना म्हणजेच NSUI च्या वतीने या घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनं करण्यात आली.
NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळला गेला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. लातूरच्या मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी आणि NSUI चे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात तीव्र घोषणाबाजी करत लातूर शहर दणाणून सोडलं.
हातात तिरंगा, पक्षीय ध्वज आणि ‘जवाब दो’ असे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर या पेपर लीकमुळे मोठा अन्याय झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये केंद्र सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेविरोधात कमालीचा संताप पाहायला मिळतोय.
NSUI च्या नेत्यांनी या संपूर्ण घोटाळ्याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बळी देणाऱ्या दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा हे आंदोलन संपूर्ण राज्यभरात आणखी तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
एनईईटी घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, आता हा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS