नांदेड : शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था रुळावर आणण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस आता ’क्शन मोड’मध्ये आले

नांदेड : शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था रुळावर आणण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस आता ’क्शन मोड’मध्ये आले आहेत. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून नियम मोडणार्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर कुठेही दुचाकी, रिक्षा किंवा चारचाकी वाहने उभी करण्यास आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः फुटपाथवर दुकानदारांनी आपले बोर्ड लावून पादचार्यांची वाट अडवल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. रस्त्यावर हातगाड्या लावणार्यांनाही वाहतुकीला अडथळा न होईल अशाच पद्धतीने व्यवसाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील सर्व मॉल चालकांना पोलिसांनी सुनावले आहे की, त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी मॉलच्या आवारातच पार्किंगची सोय करावी. ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहिल्यास त्याला मॉल प्रशासन जबाबदार धरले जाईल. यासाठी आवश्यक ते वॉचमन नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रिक्षा चालकांसाठी ’डेडलाईन’ ऑटो रिक्षा चालकांनाही पोलिसांनी फैलावर घेतले आहे. विना परमिट, फिटनेस नसलेली किंवा विमा संपलेली वाहने रस्त्यावर दिसल्यास ती तात्काळ जप्त केली जातील. तसेच रिक्षा चालकांनी गणवेशात असणे अनिवार्य असून, रस्त्याच्या मध्येच रिक्षा उभी करून प्रवाशांची चढ-उतार केल्यास गुन्हे दाखल केले जातील. वाहतूक कोंडीमुक्त नांदेड करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,आणि शहर वाहतूक शाखेचे सपोनि भागवत नागरगोजे यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर आता कायद्याचा बडगा उगारला जाणार असल्याने वाहनधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. अशाच धाडसी निर्णयामुळे आता नांदेडची वाहतूक कोंडी फुटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

COMMENTS