गेवराई : आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे समाजात असंतोष, क्लेश आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत प्रत्य

गेवराई : आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे समाजात असंतोष, क्लेश आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला आत्मिक समाधान, मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक उर्जेची नितांत गरज आहे. यासाठी प्रत्येकाने कुटुंबासह श्रीमद् भागवत कथेस उपस्थित राहून अध्यात्माचा अनुभव घ्यावा, असे प्रतिपादन दिव्य ज्योति जाग्रती संस्थानच्या कथा व्यास सुश्री वैष्णवी भारतीजी यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, ईश्वर हा केवळ मानण्याचा विषय नसून तो जाणण्याचा आणि अनुभवण्याचा विषय आहे. प्रत्येकाच्या शरीरातच ईश्वराचा वास आहे. बाह्य जगात शोधण्याऐवजी आपण आपल्या अंतर्यामी डोकावले, तर त्या चैतन्याचा साक्षात्कार होऊ शकतो. श्रीमद् भागवत कथेमुळे मन शुद्ध होते, विचार सकारात्मक होतात आणि अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत होण्यास मदत मिळते. दिव्य ज्योति जाग्रती संस्थान, शाखा पाथर्डी यांच्या वतीने गेवराई शहरातील दसरा मैदान, बीड रोड येथे 26 एप्रिल ते 2 मे दरम्यान सायंकाळी 4.30 ते रात्री 8.30 या वेळेत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसीय धार्मिक सोहळ्यात दररोज विविध आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कथेसाठी संस्थेचे संस्थापक सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या शिष्या तथा प्रख्यात कथा व्यास सुश्री वैष्णवी भारतीजी उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन करत आहेत. रविवारी सायंकाळी दसरा मैदानावर मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात कथेचा शुभारंभ झाला. प्रारंभी भक्तिगीत, भजन आणि कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले होते. परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकता अनुभवायला मिळत होती. या कार्यक्रमाला महिला, पुरुष तसेच युवक-युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कथा श्रवणाचा लाभ घेतला. या श्रीमद् भागवत कथेद्वारे समाजात नैतिक मूल्यांची जपणूक, कुटुंबव्यवस्थेची मजबुती आणि अध्यात्मिक जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे संयोजन समितीने सांगितले. अधिकाधिक भाविकांनी या भागवत कथेला उपस्थित राहून आत्मिक समाधानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्या पदाधिकार्यांनी केले आहे.

COMMENTS