माहूर : तालुक्यात दिवसेंदिवस वाढणार्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाळीव जनावरांवर गंभीर परिणाम होत असून, उष्माघाताचा धोका वाढला आहे. उन्हाळ्यात अपुरा

माहूर : तालुक्यात दिवसेंदिवस वाढणार्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाळीव जनावरांवर गंभीर परिणाम होत असून, उष्माघाताचा धोका वाढला आहे. उन्हाळ्यात अपुरा व निकृष्ट चारा, पाण्याची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे जनावरे अशक्त बनत असून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. परिणामी विविध आजारांना ते सहज बळी पडत आहेत. त्यामुळे पशुपालकांनी वेळीच खबरदारी घेऊन गुरांचे संरक्षण करावे, असा इशारा पशुवैद्यकीय विभागाने दिला आहे.
माहूर तालुक्यात गाय वर्ग 26,614, म्हैस वर्ग 1,816 आणि शेळी वर्ग 14,939 अशी एकूण 43,369 पाळीव जनावरे आहेत. मात्र सध्या उन्हाळ्यामुळे हिरव्या चार्याचा तुटवडा जाणवत असून, जनावरांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे गुरांना सावली, स्वच्छ पाणी आणि पोषक आहाराची गरज अधिक भासत आहे. पशुधन विभागाच्या सूचनेनुसार, जनावरांचे नियमित लसीकरण करणे आवश्यक असून गोठा व परिसर स्वच्छ ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो. विशेषतः गाभण व दुग्धजन्य जनावरांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
दूध उत्पादनावर परिणाम
उन्हाच्या झळा वाढल्यामुळे दूध उत्पादनात घट होत आहे. हिरव्या चार्याचा अभाव आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांच्या आहारावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे दुग्धजन्य जनावरांना दिवसातून किमान तीन वेळा – सकाळ, दुपार आणि संध्याकाळ – चारापाणी देणे आवश्यक आहे. शक्य असल्यास हिरवा चारा किंवा पेंड देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उष्माघात टाळण्यासाठी उपाय
गुरांना उन्हात बांधू नये; सावलीची व्यवस्था करावी, दिवसातून 5 ते 6 वेळा स्वच्छ पाणी पाजावे गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी पोषक व संतुलित आहार द्यावा उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी सजग राहून गुरांची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी गजानन लेंगरे यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS