मुंबई : शहरातील तरुणांमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या वापराचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे आय

मुंबई : शहरातील तरुणांमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या वापराचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका संगीत मैफिलीत अमली पदार्थांचे अतिसेवन झाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी गोरेगाव येथील नेस्को केंद्रात मोठ्या प्रमाणावर संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तीन ते चार हजार तरुण-तरुणी उपस्थित होते. संगीताच्या वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमात मद्यपानासह अमली पदार्थांचाही मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कार्यक्रमादरम्यान काही जणांनी अमली पदार्थांचे अतिसेवन केल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर दोन तरुणींना तातडीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपत्कालीन उपचार केंद्रात दाखल करण्यात आले, तर एका तरुणाला गोरेगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्या तरुणाचा मृत्यू झाला. पुढे उपचारासाठी हलवण्यात आलेल्या दोन तरुणींमधील एकीचा मृत्यू सोमवारी दुपारी झाला, तर दुसरीची प्रकृती अद्याप चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यक्रम आयोजक, संबंधित व्यवस्थापक तसेच मृत तरुणांच्या परिचितांचा समावेश करून आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. या सर्वांची सखोल चौकशी सुरू आहे. मृतांच्या रक्ताचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहे. या अहवालातून नेमक्या कोणत्या प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन झाले होते, याचा उलगडा होणार आहे. तसेच हे पदार्थ कुठून आणले गेले, याचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी आयोजक आणि प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसून समाजपातळीवर व्यापक जनजागृतीचीही तितकीच आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

COMMENTS