मुंबई: राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित ८८ नवीन महसूल कार्यालयांच्या निर्मितीची प्रक्रिया
मुंबई: राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित ८८ नवीन महसूल कार्यालयांच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य शासनाने या कार्यालयांबाबत हरकती व सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये १० अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये, ७ उपविभागीय कार्यालये, २ तहसीलदार कार्यालये आणि ६९ अप्पर तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. या संदर्भातील हरकतींचा एकत्रित अहवाल १२ जुलै २०२६ पर्यंत शासनाकडे सादर केला जाणार आहे.
नागरिकांना विविध दाखल्यांसाठी किंवा सरकारी कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये, म्हणून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन कार्यालयांची निश्चिती करताना लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. या कामासाठी प्रशासकीय जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, हरकतींवर काम पाहण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. तर अप्पर तहसीलदार कार्यालया संदर्भातील संपूर्ण काम उपविभागीय अधिकारी पाहतील. नागरिकांकडून आलेल्या सर्व अर्जांची आणि हरकतींची रोजच्या रोज तपासणी केली जाईल. जिल्हाधिकारी या सर्व माहितीवर आपले स्पष्ट अभिप्राय देऊन तो अहवाल विभागीय आयुक्त आणि त्यानंतर सरकारकडे १२ जुलै २०२६ पर्यंत विनाविलंब पाठवतील.
‘या’ प्रमुख ठिकाणांवर होणार नवीन कार्यालये:
- नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये: कल्याण (ठाणे), दापोली (रत्नागिरी), बारामती (पुणे), फलटण (सातारा), पंढरपूर (सोलापूर), किनवट (नांदेड), अचलपूर (अमरावती), पुसद (यवतमाळ), खामगाव (बुलढाणा) आणि नागपूर (ग्रामीण).
- नवीन उपविभागीय कार्यालये: मुंबई शहरातील फोर्ट, मुंबई उपनगरातील बोरिवली, तसेच शहापूर (ठाणे), देवगड (सिंधुदुर्ग), साक्री (धुळे), जामनेर (जळगाव) आणि सिन्नर (नाशिक).
- नवीन अप्पर तहसीलदार कार्यालये: मुंबई उपनगरातील चेंबूर, मालाड, वांद्रे; ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, बेलापूर; पुणे जिल्ह्यातील चाकण आणि नाशिकमधील लासलगाव व सिन्नर.
महसूलमंत्र्यांचा कोट:
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि त्यांच्या जवळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठीच या नवीन महसूल कार्यालयांची निर्मिती करण्यात येत आहे. प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा सकारात्मक विचार करून यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.”
— चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री, महाराष्ट्र

COMMENTS