कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या सन २०२५-२६ च्या निकालात अभूतपूर्व यश संपादन के

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या सन २०२५-२६ च्या निकालात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या परीक्षेत तब्बल ४३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नवी दिशा मिळाल्याचे चित्र आहे.
आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर विभागात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा हा परिणाम मानला जात आहे. गुणवत्ता आणि संधी यांचा संगम घडवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. त्यातूनच अहिल्यानगर जिल्ह्यातील ३१७, नाशिक जिल्ह्यातील ११८ आणि बीड जिल्ह्यातील ४ अशा एकूण ४३९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर वाटचाल करताना स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेला योगदानाचा वारसा पुढे नेत आमदार काळे यांनी उत्तर विभागात गेल्या सहा वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. “गुणवत्ता विकास कार्यक्रम” राबवून शिक्षणपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गुणवर्ग तयार करून स्पर्धा परीक्षांसाठी अतिरिक्त तास, विषयानुसार सराव परीक्षा, नियमित चाचण्या यांची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांशी सातत्यपूर्ण संवाद यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवता येते, हे सिद्ध झाले आहे.
गेल्या पाच वर्षांत उत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी एकूण १० कोटी ३५ लाख ८४ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली असून त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची वाट अधिक सुलभ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.


COMMENTS